संसदेच्या अंदाज समितीला 75 वर्षे पूर्ण, 23 आणि 24 जून रोजी मुंबईत परिषद होणार
भारतीय संसदेच्या अंदाज समितीला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. या अमृत जयंती वर्षाच्या निमित्ताने मुंबईत एक महत्त्वाची राष्ट्रीय परिषद आयोजित केली जाणार आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभेचे उपसभापती हरिवंश सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली 23 आणि 24 जून 2025 रोजी मुंबईतील महाराष्ट्र विधान भवनात दोन दिवसांची ही परिषद होणार आहे.
मुंबई: भारतीय संसदेच्या अत्यंत महत्त्वाच्या अंदाज समिती (Estimates Committee) ला यंदा 75 वर्षे पूर्ण होत आहेत. या अमृत जयंती वर्षाच्या औचित्याने एक राष्ट्रीय परिषद (National Conference) 23 आणि 24 जून 2025 रोजी मुंबईतील महाराष्ट्र विधान भवनात आयोजित करण्यात येत आहे. या परिषदेस लोकसभा अध्यक्ष मा. ओम बिर्ला तसेच राज्यसभेचे उपसभापती मा. हरिवंश नारायण सिंह यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
या दोन दिवसीय परिषदेमध्ये देशभरातील विविध राज्यांच्या विधानमंडळांतील प्रतिनिधी, संसद सदस्य, तज्ज्ञ आणि प्रशासकीय अधिकारी सहभागी होणार आहेत. अंदाज समितीचा इतिहास, कार्यप्रणाली, परिणामकारकता तसेच भविष्यातील दिशा यावर विचारमंथन आणि सखोल चर्चा होणार आहे.
अंदाज समिती ही लोकसभेच्या प्रमुख समित्यांपैकी एक असून तिची स्थापना 1950 मध्ये झाली होती. ही समिती सरकारच्या विविध विभागांच्या खर्चाचा आढावा घेते, निधीच्या योग्य वापरावर लक्ष ठेवते आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी शिफारसी करते. संसदीय उत्तरदायित्व आणि पारदर्शकता यामध्ये अंदाज समितीचा मोलाचा वाटा राहिला आहे.
या परिषदेमध्ये विविध सत्रांमध्ये तज्ज्ञ व्याख्याने, राज्य व केंद्रातील अनुभवांची देवाणघेवाण, संसदीय समित्यांच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यावर चर्चा आणि भविष्यातील आव्हाने व नवोपक्रमांची दिशा ठरविण्यात येणार असून, या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय करत असून, राज्याने यासाठी विशेष तयारी केली आहे. संसदीय कार्य संस्कृती, कार्यप्रणाली आणि लोकाभिमुख प्रशासन यावर महाराष्ट्राचा अभ्यास देशासाठी मार्गदर्शक ठरण्याची अपेक्षा आहे.